Thursday, May 4, 2017

चांदण्यातली भ्रमंती (कात्रज-सिंहगड)

सह्याद्री भटकायच्या मोहात एकदा अडकलं की त्यातून बाहेर पडणं अशक्यचं. त्यात रेंज ट्रेक तर आमचा वीक पॉईंटच. कात्रज ते सिंहगड रात्रीच्या गार हवेतून केली जाणारी पायपीट. भटकंतीसोबत महिन्याभरापूर्वीच प्लान ठरवून टाकला. तसही रात्रीचं पदभ्रमण बरेच दिवस केलं नव्हतं. हैदराबाद एक्सप्रेस ने पुण्यात अवतरलो. थोडा चहा मारला. स्वारगेटला जाणाऱ्या टिप्पीकल पीएमपीएम्एल  मध्ये बसलो. खणखणीत आवाजात बस सुरू झाली. 
स्वारगेटहून कात्रज बोगद्याकडे जाणारी कोंढणपूर बस पकडली. खचाखचं भरली होती बस. उभ रहायला जागा मिळाली थोडीफार. एक काका भेटले कोंढणपूरचे. कोंढणपूर हे सिंहगडच्या पायथ्याचं गावं. काकाही थोडेफार किल्ले भटकले होते. पार जिंजीपर्यंत. तार जुळली. गप्पांचा फड रंगला. राजांचा इतिहास बऱ्यापैकी माहीत होता त्यांना. बोलता बोलता कात्रज बोगदा आला देखील. काकांना निरोप देत उतरलो. पार काळोख पडला होता. वर चढत टेपावर वाघजाई मंदिरापाशी आलो. ओळख परेड झाली. बरेच मुखडे नवीन होते. त्यात आकर्षण होते ते गुटगुटीत बालक निर्वाणचं. गोल पोटावर टॉर्च मस्त  अडकवला होता पठ्ठयानं. हातात काहीतरी आवाजाचं यंत्र होतं. काय होत ते तोचं जाणे असो. वाघजाईच दर्शन घेत सिंहगडाकडे कूच करण्यास सुरूवात केली. सिंहगड म्हटलं कि आठवतो तानाजी, सूर्याजी,शेलार मामा. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. डझनाहून अधिक टेकड्या पार करायच्या होत्या. मध्ये पाणी नाही. त्यामुळे पाठीवर पाण्याचा साठा होता. पहिलं टेकाडं चढायला सुरूवात केली. बऱ्यापैकी चढण होती. पाय जरा जास्तच पुढे टाकला तोच पँटने दगा दिला. भिती होती तेच झालं. म्हटलं सकाळी पाहू आता. रात्र असल्यामुळे जमून जाईल. त्यामुळे काही तसदी घेतली नाही. पँटच्या उत्पादकाला मनात लाखोली वाहत पुढे सटकलो. टेपावर आलो. आकाश चांदण्यांनी लगडलेलं. चंद्राची मस्त कोर वर आलेली. वारा अंगाला झोंबत होता. उजव्या बाजूला दिव्यांच्या झगमगाटात अवघं पुणं न्हाऊन निघालं होतं. तर डावीकडे शांततेत पहुडलेलं खेड शिवापूर, कोंढाणपूर. थोडं थांबून हा नजारा डोळ्यात साठवला. 

पुण्याचा झगमगाट 

आता बोगद्यावरून चालायला सुरूवात केली होती.खालून जाणाऱ्या गाड्या मागे पडत होत्या. वाऱ्याची झुळूक ,सोबत चांदण्या, आणि एका पाठोपाठ एक अश्या टेकड्या. मन रमू लागलं. सह्याद्री परिचयाचा असल्याने टॉर्चच्या प्रकाशात ताडताड टेकड्या पार करत होतो. एव्हाना चारू भूकेने कुरूकूरू लागली. तस सगळ्यांच्याच पोटात कावकाव सुरू झाली होती. एका ठिकाणी जागा बघून शिदोरी सोडली. म्हणता म्हणता सगळं फस्त. ढेकर देत पोट भरल्याची पावती दिली. आता वेळ होती ती थोडावेळ पाठ टेकण्याची. वाऱ्यामुळे डुलकी लागत होती. पण अजून बरचं अंतर कापायचं होतं. पुढे निघालो. सिंहगडावरच्या दूरदर्शनच्या मनोऱ्यावरील लाल दिवा दिसत होता. दिशादर्शकच होता तो. पुढे थोडं वाट चुकलो. होतो तिथेच परतलो. सुदैवाने वाट लवकर सापडली. पूर्ण घसरडीची वाट होती. पाय स्थिरावत नव्हते. या वाटेवर उजव्या हाताला पूणे शहर ठेवल्यास वाट शोधणे सोपं जातं. मजल दरमजल करीत टेकड्या ओलांडत होतो. कस्तुरी सोबत असल्याने मधेच आकाशदर्शन होत होतं. थोडीफार ज्ञानात भर पडत होती. पुन्हा एकदा वाट सापडत नव्हती दिवा तर दिसत होता. त्यावेळी अमितने वाट ताडली. सर्वांनी शिक्कामोर्तब केले. चालू लागलो. एव्हाना पुणे साखरझोपेत गेलं होतं. मध्ये मी व मंदार फारच पुढे गेलो. मग थोडं विसावलो. मागचे आल्यावर परत तंगडतोड सुरू झाली. आता मात्र चढ उतार कठीण होत चालले होते. घसरणाऱ्या मातीमुळे चालणं अवघड होत होतं. पुन्हा एकदा दिशाभूल झाली. परंतु लांबवर असलेल्या भल्या माणसाने टॉर्च ने दिशा दाखवली. मी ताडलं कि रस्ता उजवीकडे आहे. शेवटच्या टेकड्या फारचं दमछाक करणाऱ्या होत्या. खडी चढण तीव्र उतार. त्यात घसाऱ्याची भर. सिंहगड आता मृगजळाप्रमाणे भासत होता. अंतर संपता संपेना. एक खडी चढण चढून वर आलो. सपाटीची वाट लागली. आता थोड्याच वेळात पक्की सडक लागेल असं भूषण सांगत होता. वाट जंगलातली होती. बिबट्याविषयी चर्चा सुरू झाली. सावध पवित्रा घेत चालत होतो. पक्की सडकही आता दिसू लागली. पण तोच रस्ता आहे कि नाही ही शंका होती. पुन्हा मागे आलो. बिबट्याच्या नादात रस्ता चुकलो कि काय असं वाटू लागलं. वॉकी टॉकी वरून खात्री झाली कि तीच वाट आहे. खाली उतरलो. टपरीवर चहा पित सिंहगडावर पोहोचलो. नुकतचं तांबड फुटत होतं. त्याकडे टक लावून बसलो. दूर डोंगरांमधून सोनेरी तेजोमय किरण आपलं अस्तित्त्व दाखवू लागली होती. चालून आलेला थकवा भास्कराच्या दर्शनाने कुठल्या कुठे पळून गेला. खाली खडकवासला धरणाचा जलाशय दिसत होता. 
पोहे खात गड भटकण्यास सज्ज झालो. बुलंद असा सिंहगड. पुणे दरवाजा,खांदकडा,दारूचं कोठार,घोडेपागा,देवटाकं,गणेश टाकं,राजाराम समाधी,कलावंतीण बुरूज, कल्याण दरवाजा पहात नरवीर तानाजींच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. थोडं विसावलो. मामांनी तानाजींची शौर्यगाथा असलेला सुंदर असा पोवाडा म्हटला. गूढतेत मग्न झालो. तानांजीनी गाजवलेला पराक्रम डोळ्यांसमोर आला. पराक्रमी ,दक्ष असलेल्या किल्लेदार उदेभान राठोडशी सिंहासारखा लढला. प्राणांची आहुती दिली. गड स्वराज्यात आला पण सिंह मात्र गेला. तानाजी ,सूर्याजी,शेलारमामा यांचे पराक्रम. 

पुणे दरवाजा 






गडफेरी करताना दोन यूरोपियन पण सध्या पुण्यांत काम करणाऱ्या दोघांशी भेट झाली. थोड़ी चर्चा झाली. इतक्या तन्मयतेने गड पाहत होते ते. त्यांची गडाची तटबंदी आणि आजूबाजूचे सुरक्षेसाठी असणारे डोंगर यावर चर्चा आणि बऱ्याच ठिकाणी असलेले सेल्फीमग्न पर्यटक. जमीन आस्मानाचा फरक. आपण केव्हा शिकणार? असो. एक आगळा अनुभव भटकंतीच्या पोतडीत जमा करत मुंबईकडे रवाना झालो. 

4 comments:

  1. Wah 👍👍👍 aapratim ,keep write keep travel
    -swanandi

    ReplyDelete
  2. You really had good sense of writing or bhatkanti....
    I wish I could develop same

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Swarupa!! I write experience. Each tour teaches a lot and I learn from that. Your appreciation always motivate me write further.

      Delete