Saturday, October 7, 2017

नाशिक धमाका : भाग एक

चौल्हेर 

विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रसादचा नाशिक प्लान. सलग तीन दिवस सुट्टी. सीमोल्लंघन करायचा बेत आखला.नाशिक म्हणजे गडकिल्ल्यांची खाणंच. ट्रेकर्सची फारशी गर्दी नसलेले आडवाटेवरचे हे किल्ले. सातमाळ,डोलबारी,सेलबारी रांगा,पावसानंतरचं बागलाण अनुभवण्यास मन आतुर झालं. राजेंद्रनगर एक्सप्रेसनं नाशिकला निघालो. रात्री अडिचच्या सुमारास नाशकात उतरलो. शहर तसं बऱ्यापैकी जागं झालं होतं. पुणेकर मंडळी बिटको चौकात भेटणार होती. त्यांची वाट पाहत असताना फुल्ल तळीरामांनी थोडा उपद्रव करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही दाद न दिल्यामुळे वाद घालण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरला. काही वेळात पुण्याच मंडळ पोहोचल. गाडी सटाण्याच्या दिशेत निघाली बागलाणात. बसल्या बसल्या डुलकी येऊ लागली. चौल्हेरवाडीत पोहोचेपर्यंत सकाळ झाली. मॅगीचा नाश्ता उरकत पावलं डोंगर सोेंडेवरून चौल्हेरकडे निघाली. चढाई तशी सोपी पण काही ठिकाणी बऱ्यापैकी चढ असणारी. नेहमीप्रमाणे डांगे सर व संजय सर आघाडीवर होते. वाटेत झाडं नसल्याने ऑक्टोबरचा उन्हाळा जाणवू लागला होता. चढण पार करत कातळ पायऱ्यापाशी आलो. पुढे भुयारी दरवाजे तीन एका ओळीत. अफलातून  अशी वास्तूकला.
चौल्हेर दरवाजा व कातळ पायऱ्या 


पठारावर आलो. तर चौल्हेरला गड किल्ले सुळक्यांनी वेढलेलं. टकारा सुळका,साल्हेर सालोटा,भिलाई,हरगड,मुल्हेर,मोरा,मांगी,तुंगी आणि पुसट दिसणारे बिश्ता अजमेरा.कोथमिऱ्या थाटात उभा होता. बालेकिल्ल्यावर जाताना डाव्या बाजूस एक प्राचीन मंदिर आहे. ते पाहून पाण्याच्या टाक्यापाशी यायचं. तृप्त होत दगडी जिना चढत माथ्यावर आलो. येथे काही जुने अवशेष आढळतात. पाण्याची  टाकी आहेत पण पाणी पिण्यायोग्य नाही. वरून बलदंड धोडपचं व् अख्या सातमाळ रांगेच दर्शन घडतं. 
कोथमीऱया 

गडावरील मंदिर 


डोळ्यांना मिळालेल्या मेजवानीनंतर गड उतरायला सुरूवात केली. माती बारीक दगड(स्क्री) यावरून उतरत गाव गाठलं. गावात पोहोचताच गावकऱ्यानं गरमागरम पिठलं भाकरी खाऊ घातली. सध्या काही ठिकाणी किल्ल्यांच्या गावात सुरू असलेल्या बाजारूवृत्तीत ती  चतकोर भाकर सुखाऊन गेली. पुढंच लक्ष होतं भिलाई. गावात पोचेपर्यंत सूर्यदेव माथ्यावर आले होते. शिदोरी सोडली गेली. पोटोबा आटपत फार विश्रांती न घेता भिलाईकडे चालू लागलो. अंगावर येणारा चढ खालून दिसत होता. उन्हाचे चटके बसत होते.तरी नेटाने चढत होतो. श्वासाची गती वाढू  लागली. थोडं वर गेल्यावर वाऱ्याचा सुखद स्पर्श व भवताली डोंगररांगा सोबतीला होत्याच. 























भिलइ 



थोड़ पुढे जाताच पाण्याचं टाकं लागतं. थोडी अंगावर येणारी तिरकस चढाई करत छोटा कातळटप्पा पार करत माथ्यावर यावे. डोंगर सभवताल न्याहाळावा. आलो त्या वाटेने खाली उतरत डाव्या बाजूस थोडी चाल ठेवत कातळात कोरलेलं मंदिर पहात उतरण्यास सुरूवात केली. निसरडी जेमतेम पाऊल मावेल अशी अरूंद वाट. एका बाजूला घसारा. पावलं तोलून मापूनच टाकावी लागतात. काही ठिकाणी बारीक रेतीवरून धावतच जावं लागत( स्क्री वर पाय टिकत नाहीत). असं करत करत पोहोचलो एकदाचे पायथ्याशी. पुढचा प्रवास बसचा सावरपाड्यापर्यंत. गावातील बहुतेक माणसं साल्हेरच्या यात्रेला गेल्याने वाटाड्याची शोधाशोध सुरू होती. दोन तीन पोरं तयार झाली. पण वेळ संध्याकाळची व वाट जंगलाची असल्याने ते थोडं जिकीरचं  होतं. शेवटी वाटाड्या मिळाले. पिंपळ्यावर जाऊन मुक्काम करण्याचे ठरले. अंधार पडायच्या आत पोहोचण गरजेचं होतं. भरभर निघालो. काही वेळातच धरणाच्या परिसरात आलो.
मागे पिंपळ्या 







मावळतीचे रंग 
 नारायणराव पश्चिमेकडे कललेले, धरणाचं शांत पाणी,थोडी गार हवा, मोहरलेली पिवळी फुलं त्या पार्श्वभूमीवर मागे उभा असलेला पिंपळ्या व त्याचं आकर्षित करणारं भलं मोठं नेढं. सारचं क्षणभर थांबून पहाण्यासारखं. वाट काढत पुढे चढण नंतर पठार लागलं. पुन्हा चढण पठार. एव्हाना भास्कर मावळतीकडे झूकू लागला. त्या शांत वातावरणात रंग उधळत होता. सांजरंग चढ़त होते. सुखद अस चित्र.  त्याकडे पहात पठारावरची रपेट सुरू होती. हे अखेरचं पठार. समोर पिंपळ्या नजरेत येऊ लागला. आणि खडा चढही. अंधार पडू लागला होता. टॉर्चच्या झोतात सत्तर अंशातली चढण चढत होतो. पाठीवरच्या ओझ्यामुळे थकलो होतो. पंधरा ते वीस मिनिटात नेढ्यात आलो. भलं मोठं शे दिडशे माणसं सहज मावतील असा त्याचा विस्तार.याची आख्यायिका सांगितली जाते की परशुरामानी समुद्र हटवताना साल्हेर वरुन मारलेल्या बाणामुळे निर्माण झालं.  वारा सू सू करत कानात शिरत होता. नेढ्यात थोडं ताजतवान वाटत असलं तरी भर्राट वाऱ्यात रात्र काढणं शक्य नव्हतं. नेढ्यापुढील गुहेत डेरा टाकला. पायपीटीमुळे सपाटून भूक लागली. मिळेल ते पोटात ढकलत आडवे झालो. पिंपळ्यावरच्या झूंजूमुंजू पहाटेसोबत उठलो. सारं आवरत नेढ्यापुढील लहानश्या कातळटप्प्यावरून माथा गाठला.  नजर स्थिरावली क्षितिजावर उगवत्या दिनकराकडे. तो आपली तांबूस सोनेरी किरणं बाहेर फेकत हळूहळू क्षितिजावर येत होता. नाशकातल्या सह्यमंडळातील शिखरं, रांगा लख्ख दिसत होत्या. पश्चिमेला हातगड़ उत्तरेस  साल्हेर सालोटा दर्शन देत होते. अलौकिक असं दृष्य.  पुन्हा एकदा नाशिक रांगांची उजळणी  झाली. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य अस की दुरवरच्या रांगा अनुभवता येतात मग ती सातमाळ असो की डोलबारी सेलबारी. हे दृश्य तासंतास निरखावसं वाटत. नारायणराव बऱ्यापैकी वर आले होते. पुढच्या किल्ल्याकडे कूच करायचे होते. सत्तर अंशातल्या उतारावरून सावध उतरत पठारावर आलो व धडधडत गावात धरणात  डुंबण्यासाठी. 

पिंपळगडाचं नेढं 

नाशिक डोंगररांगा 

पिंपळ्यावरील नयनरम्य  सूर्योदय 

पिंपळ्यावर  निळूभाऊ